मुंबई - राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला "यू टर्न'चा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून, याप्रकरणी पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी, याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता, त्या वेळी सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू; तसेच 1 ऑगस्टपासून खाद्यपदार्थांचे किमान विक्री मूल्य समान राहील, अशी भूमिका घेतली होती.
मात्र या भूमिकेवरून अचानक "यू टर्न' घेत सरकारने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती. सरकारच्या या भूमिकेवर धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे संशय व्यक्त केला आहे. विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या ठिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टिप्लेक्समध्ये अशी बंदी घालून सरकार मल्टिप्लेक्स चालकांना प्रेक्षकांची लूट करण्याचा उघड परवाना देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
|