मुंबई - शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू झाली आहे. आज (ता. 31 ऑगस्ट) दुपारी चारपर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38 लाख 90 हजार 404 शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये ऑनलाइन भरण्यात येत आहेत. यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
|