मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 55 टक्के, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के, तर धारणी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले, की भिवंडी-निजापूर महापालिकेसाठी 53, मालेगाव महापालिकेसाठी 60, तर पनवेल महापालिकेसाठी 53 टक्के मतदान झाले. नागभीड (जि. चंद्रपूर) नगर परिषदेसाठी 71.5, नेवासा (जि. नगर) नगरपंचायतीसाठी 81.4, रेणापूर (जि. लातूर) नगरपंचायतीसाठी 76.7, तर शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी 87.5 टक्के असे एकूण सरासरी 77.9 टक्के मतदान झाले. याशिवाय जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगर परिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झाले. नगरपंचायतीच्या आणि नगर परिषदांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी एकत्रित सरासरी 73.4 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील आज मतदान झाले. येथे एकूण दहा जागांसाठी सरासरी 42 टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी 26 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल.
|