मुंबई - पदोन्नतीचा आनंद आणि समाधान किती असते, हे सरकारी अधिकाऱ्यांना विचारून पाहा! मात्र पदोन्नती झाल्यानंतर वर्षभरातच उपसचिवपदावरून मूळ अवर सचिवपदावर अवनती झाल्याचा आदेश निघाल्यावर या अधिकाऱ्यांची अवस्था काय झाली असेल? कोणतेही कारण नसताना मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांवर ही वेळ आली आहे.
म. द. जाधव, हे 2015-16 च्या निवडसूचीवर, तर 2014-15च्या निवडसूचीनुसार ब. शे. मांडवे, अ. ना. वळवी, प्र. ब. सुरवसे, श्या. र. चौरे या पाच अधिकाऱ्यांची सामान्य प्रशासन विभागाने अवर सचिवपदावरून उपसचिवपदावर पदोन्नती केली. निवडसूचीला अनुसरून या अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली होती. मात्र या अधिकाऱ्यांना मधल्या काळात सिटी टॉवर प्रकरण भोवले. या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मुळावर अप्रत्यक्षरीत्या हे सिटी टॉवर प्रकरण बेतले, म्हटले तर वावगे ठरू नये.
सिटी टॉवर ही मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी निवासी सोसायटी स्थापन केली होती. या सोसायटीबाबतच्या गैरप्रकरणामुळे या सोसायटीसंदर्भातील अनेक अधिकाऱ्यांची यापूर्वी चौकशी झाली. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पदोन्नती रोखली होती. या कारवाई विरोधात भा. र. गावीत व इतर यांनी महाराष्ट्र प्रशायकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. यामध्ये या प्रकरणातील अधिका-यांना अवर सचिव, उप सचिव पदोन्नतीच्या तारखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवर सचिव प्रवर्गातील अधिका-यांची 2012 ते 2016 या कालावधीसाठी तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये हे पाच अधिकारी बाहेर पडले गेले. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पदावनत करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाला घ्यावा लागला असल्याचे सांगितले जाते.
|