मुंबई - राज्यांतर्गत सुरू होणाऱ्या विमानसेवांना खीळ बसली आहे. विविध शहरांना, धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या विमानसेवेला लवकरच प्रारंभ होणार होता; मात्र विमान उड्डाणासाठी लागणाऱ्या निश्चित वेळा गुजरातमधील शहरांनी पळवल्यामुळे राज्यातील विमानसेवा लांबणीवर पडली आहे. राज्य प्रशासनातील दिरंगाई नडल्याचे त्यामागे कारण आहे.
राज्यात सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक आणि नांदेडमधून मुंबईत विमानसेवा सुरू करण्याबाबत मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या "जीव्हीके' कंपनीने येण्या जाण्याच्या आठ वेळा निश्चित केल्या. मात्र प्रशासनाने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास दिरंगाई केल्यामुळे यातील सहा वेळा गुजरातमधील पोरबंदर, सुरत आणि कांडला विमानतळांनी पळवल्या आहेत. आता "जीव्हीके'कडे वेळांचा पुरेसा स्लॉटच शिल्लक नसल्याने राज्यातील विमानसेवेबात तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशातील सर्वसामान्यांना अत्यंत कमी दरात विमानसेवेचा वापर करता यावा, तसेच तालुके एकमेकांना जोडले जावेत, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2016 मध्ये "उडान' या योजनेचा शुभारंभ केला. ज्या ठिकाणी विमानतळ आहे; मात्र विमानसेवा सुरू नाही वा कमी प्रमाणात विमाने सुरू आहेत अशा नऊ ठिकाणी प्रामुख्याने ही सेवा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार राज्यात पहिल्या टप्प्यात सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक आणि नांदेड या ठिकाणी सेवा सुरू करण्याचे ठरले. त्यापैकी नांदेड येथे एप्रिलमध्ये विमानसेवा सुरू झाल्याने "जीव्हीके'ने उर्वरित चार विमानतळांसाठी विमाने येण्या-जाण्यासाठी आठ वेळा देण्याबाबत तयारी दर्शवली.
या ठिकाणी ज्या विमान कंपन्यांना विमानसेवा पुरवायची आहे त्या संबंधित कंपन्यांसोबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम प्रशासनाकडे होते. त्यासाठी त्यांनी "जीव्हीके'सोबत संपर्क साधून कागदपत्रांच्या बाबी पूर्ण करायच्या होत्या. मात्र यात प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याचे कळते. दरम्यानच्या काळात गुजरातच्या प्रशासनाने "उडान' योजनेतंर्गत पोरबंदर, सुरत तसेच कांडला विमानतळांवरील विमाने मुंबईत येण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्याने आठ वेळांमधील चार वेळांचा स्लॉट त्यांना मिळाला आहे.
|