मुंबई - नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आगे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन आगेच्या कुटुंबीयांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणातील फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आठवलेंनी सांगितले.
नितीन आगेचे वडील राजू आगेंनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन नितीन आगेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राजू आगे यांच्या कुटुंबाला खर्डा गावात धोका आहे. त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे. तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा, अशी तसेच आर्थिक स्थिती बिकट असल्याने समाजाने पाठबळ देण्याची मागणी केली.
अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डीच्या मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या अमानवी गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली. मात्र, त्याच जिल्ह्यात खर्डा गावात नितीन आगेच्या अमानुष हत्येतील आरोपी सबळ पुरावे आणि साक्षीदार असताना निर्दोष सुटले. एकाच जिल्ह्यातील या दोन्ही प्रकरणात वेगवेगळे निकाल आल्यामुळे समाजात संदेश चुकीचा जात आहे. त्यामुळे नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. तसेच या केसमधील फुटीर साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
|