मुंबई - अर्भक मृत्यू (0 ते 1 वर्ष) पाठोपाठ महाराष्ट्राचा बालमृत्यू (1 ते 5 वर्षे) दर 24 वरून 21 वर आला असून, मागील वर्षापेक्षा तीन अंकांनी घट झाल्याची नोंद केंद्र शासनाच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (एसआरएस) 2016 च्या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालानुसार केरळ, तमिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्राचा बालमृत्यू दर देशात कमी झाल्याचे नमूद केले आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले, की आरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करीत आहे, त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले आहे. बालमृत्यूबाबत 2016 च्या अहवालात सर्वांत कमी बालमृत्यू केरळ (11), तमिळनाडू (19) या राज्यांत असून, त्यानंतर महाराष्ट्राचा (21) क्रमांक येतो. संपूर्ण देशाचा बालमृत्यू दर हा 39 एवढा असून, त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा चार अंकांनी घट झाली आहे. सर्वाधिक बालमृत्यू मध्य प्रदेश (55), ओडिशा (50), आसाम (52), छत्तीसगढ (49), उत्तर प्रदेश (47), राजस्थान (45), कर्नाटक (29), गुजरात (33), दिल्ली (22) अशी नोंद आहे. 2013 मध्ये महाराष्ट्राचा बालमृत्यू दर 26 होता.
अर्भकांचे लसीकरण, अर्भकांसाठी गृहभेटीद्वारे तपासणी व उपचार सेवा, जव्हार, मोखाडा, तलासरी, मेळघाट येथे पुनरागमन शिबिराच्या माध्यमातून स्थलांतरित झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी आणि खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने तपासणी शिबिर यांसारख्या उपाययोजना करण्यात येत असल्याने अर्भक व बालमृत्यू दर घटता ठेवण्यात यंत्रणेला यश येत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे 20 लाख बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
|