कॉंग्रेसचे आता राज्यव्यापी आंदोलन
मुंबई - "माझी कर्जमाफी झाली नाही' या नावाने प्रदेश कॉंग्रेसने राज्यव्यापी अभियानाची आज घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीत या आंदोलनाबाबत भूमिका मांडली. उद्यापासूनच बुलडाणा जिल्ह्यातून हे अभियान सुरू होणार आहे.
कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन त्या तहसीलदार आणि सरकारला दिल्या जातील. शिवाय, प्रत्येक गावात कर्जधारक शेतकरी व कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी यांची संख्या दाखवणारे फलकही लावण्यात येणार आहेत. सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणा चुकीच्या आणि फसव्या असून जून 2017 पर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी कॉंग्रेसची मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे, त्यांच्याबाबत कोणताही निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. या सर्व शेतकऱ्यांचेही संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
|