मुंबई - राज्यातील अडचणीत असलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबर 2017 पूर्वी कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
"सह्याद्री' अतिथीगृह येथे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, की राज्यातील गरजू आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य शासनाने पावले उचलली आहे. 31 ऑक्टोबरपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी चार महिन्यांचा वेळ घेण्यात आला आहे. कर्जमाफीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा आधारही घेण्यात येणार आहे. या शेतकरी संपाच्या काळात काल राज्यातील 307 बाजार समित्यांपैकी 300 बाजार समित्या कार्यरत होत्या. उर्वरित सात बाजार समित्यांपैकी चार सुटीवर होत्या, तर तीन बाजार समित्यांनी "बंद' पाळला होता, असेही त्यांनी सांगितले.
|