मुंबई - हजारो शिक्षकांचे रखडलेले पगार तातडीने द्या. पगार कोणत्या बॅंकेत जमा करायचे याचा निर्णय नंतर घेता येईल, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले. यामुळे शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने मुंबई आणि ठाण्यातील शिक्षकांचे पगार जमा होणाऱ्या बॅंका बदलल्या आहेत. पूर्वी युनियन बॅंकेमार्फत शिक्षकांना पगार दिला जात होता. आता सरकारने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच ठाण्यातही बॅंक बदलल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून, राष्ट्रीयीकृत बॅंकेतच पगार जमा करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. शिक्षकांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
शिक्षकांना ज्या बॅंकेत सोईस्कर ठरेल तेथे पगार जमा करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले. पगार कोणत्या बॅंकेत ठेवायचा याबाबतचा निर्णय राज्य सरकार धोरणात्मकपणे घेऊ शकते; मात्र त्याआधी शिक्षकांचे पगार जमा करा, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होईल.
|