मुंबई - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्याचाच भाग म्हणून शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध निर्णय घेतले आहेत. यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. त्यामुळे कानगाव येथील शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. कानगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शेतकरी विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
फडणवीस म्हणाले, की राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र लाभार्थी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी, यासाठी "सोलर फीडर'ची योजना हाती घेण्यात आली आहे. दीड वर्षात सगळे फीडर सोलरवर आणून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवरही सरकार सकारात्मक आहे. त्यातील अनेक मागण्या पूर्ण झाल्या आहेत. इतर प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे कानगाव येथील शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा.
या वेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, कानगावचे सरपंच संपत कडके, उपसरपंच बापूराव कोऱ्हाळे, भानुदास शिंदे, भास्कर फडके आदी उपस्थित होते.
|