मुंबई - तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या बोलघेवड्या, कृतिशून्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. 31 ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तर, आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
या वेळी "राष्ट्रवादी'ने "भाजपचे तीन साल, महाराष्ट्र बेहाल' अशी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारी माहिती पुस्तिका प्रकाशित केली. यामध्ये सरकारने या तीन वर्षांत जनतेचा जो भ्रमनिरास केला, त्याबद्दलची माहिती संकलित केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आणि टीव्हीवर चाललेली मुख्यमंत्र्यांची जाहिरात पाहिली, त्यात त्यांनी "प्रामाणिक' कर्जमाफी असा शब्द वापरला आहे. मात्र, ही कर्जमाफी अप्रामाणिक असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रमाणिक या शब्दापुढे "अ' लावावा अशी कर्जमाफीची परिस्थिती असल्याची टीका तटकरे यांनी केली.
आघाडी सरकारच्या काळात कापसाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करणारे लोक आज किमान आधारभूत किंमत मागत आहेत. गुजरातमध्ये कापसाला 500 रुपये बोनस दिला जात आहे. गुजरात निवडणुकीसाठी हा निर्णय घेतला गेला, असे आम्ही म्हणणार नाही. पण, त्या निर्णयामध्ये जर प्रामाणिकपणा असेल, तर महाराष्ट्रात असा प्रामाणिकपणा दाखवणार काय? असा सवाल तटकरे यांनी केला.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
|