मुंबई - शेतकरी संपावर जाणे, ही इतिहासातली अभूतपूर्व घटना असून, सरकारसाठी मात्र नामुष्कीची आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचेच या सरकारचे धोरण असल्याने शेतकरी संपावर गेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
निवडणुकीच्या अगोदर या सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी सरकार येताच कर्जमाफी केली. महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय अथवा धोरण होत नसल्याने शेतकरी व्यथित झाला. यामधूनच संपावर जाण्याचे पाऊल शेतकऱ्यांनी उचलले आहे. मात्र, केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकार शेतकऱ्यांमधे फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
शेतकऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे आवाहन करतानाच फळे, भाजी व दुधाची नासाडी करू नये. याबाबत वेगळ्या पद्धतीने भूमिका घेत दूध, भाजी व फळे गावातील गरिबांना वाटून त्यांच्याशी नाळ घट्ट करावी, असे आवाहनही पवार यांनी केले.
|