मुंबई - राज्यात लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज्यभरात 46 लाख लोकांची हरित सेना सज्ज झाली आहे. 26 मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यात 46 लाख 8 हजार 795 लोकांनी तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
यामध्ये सर्वाधिक नोंदणी लातूर जिल्ह्यात झाली असून, ती 4 लाख 66 हजार 167 इतकी आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात 3 लाख 99 हजार 660, तर बीड जिल्ह्यात 3 लाख 55 हजार 374 इतकी हरित सेनेची नोंदणी झाली आहे. चौथ्या स्थानावर नाशिक जिल्हा असून, तिथे 2 लाख 72 हजार 185 नोंदणी झाली आहे. पाचव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे. तिथे 2 लाख 27 हजार 540 हरित सैनिकांची नोंद झाली आहे.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा, त्याचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे म्हणून वन विभागाने महाराष्ट्र हरित सेना स्थापन करण्याचे निश्चित केले आणि राज्यभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या तसेचhttp://www.mahaforest.nic.in यासंकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
|