मुंबई - निलंग्यातील हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विमान वाहतूक महासंचालकांनी नेमलेले पथक घटनास्थळी रवाना झाले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच पूर्वनिर्धारित दौऱ्यावर निघाले.
म्हैसूर येथे श्री गणपती सच्चिदानंद स्वामी यांच्या अमृतमहोत्सवासाठी फडणवीस सकाळी लवकरच विशेष विमानाने गेले. कार्यक्रमात कोणताही बदल न करता ते आज म्हैसूरकडे निघाले. कर्नाटकातून हे विशेष विमान मुंबईत आले अन् त्यानंतर लगेचच ते हेलिकॉप्टरने अमरावतीकडे निघाले.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अमरावती भागात ते पाहणीसाठी जाणार असे पूर्वीच निश्चित झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या या दौऱ्याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. मात्र या संपूर्ण कार्यक्रमात कोणताही बदल न करता मुख्यमंत्री मुंबईहून अमरावती आणि तेथून नागपूरला गेले. त्यांच्या दौऱ्याच्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आणि त्यांचे परिचित त्यांना घट्ट मिठी मारत होते, हाच काय तो बदल होता.
गुरुवारी अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये समवेत असलेले स्वीय सहायक अभिमन्यू पवार आजही मुख्यमंत्र्यांसमवेत होते. क्षतिग्रस्त हेलिकॉप्टरऐवजी दुसऱ्या हेलिकॉप्टरने प्रवास केला हाच काय तो बदल होता, असे पवार म्हणाले.
|