मुंबई - जास्त व्याजाच्या मागे लागून गुंतवणूकदारांनी अयोग्य जागी पैसे टाकू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी केले. समृद्धी जीवन समूह प्रकरणी सुभाष साबणे यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत ते उत्तर देत होते.
'समृद्धी'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश मोतेवार यांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली. मालमत्ता विकून त्यातून आलेल्या निधीतून गुंतवणूकदारांची देणी परत केली जात आहे.
यासंदर्भात "सेबी'चे नियम कडक आहेत. त्यानुसारच गुंतवणूक व्हावी, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, फसवणुकीच्या तक्रारीत सध्या वाढ होते आहे. "ईओडब्ल्यू'तर्फे या प्रकरणांचा तपास केला जातो. प्रकरण मोठे असल्यास त्याची विशेष चौकशी पथकातर्फे (एसआयटी) केली जाते.
मालमत्ता अधिगृहित केल्यावर ती विकण्याची प्रक्रिया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यामार्फत होते. ही कारवाई मार्गी लावण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक आहे.'' या वेळी आमदारांनी मैत्रेय गैरव्यवहार, अकोल्यातील मायक्रोफायनान्स व पुण्यातील गैरव्यवहारांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
|