73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या 25 वर्षांनिमित्त राष्ट्रीय परिषद
मुंबई - भारतीय राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात 2 व 3 नोव्हेंबरला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते; तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
सहारिया म्हणाले, 'परिषदेचा विषय 73 व 74 व्या घटनादुरुस्तीची 25 वर्षे : प्रगती आणि भावी वाटचाल असा आहे. या घटनादुरुस्तीच्या तरतुदीनुसारच प्रत्येक राज्यात स्वंतत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने या परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबई विद्यापीठातील फिरोजशहा मेहता भवन (विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ पूर्व, मुंबई- 98) येथे ही परिषद होईल.
राज्यपालांच्या हस्ते 2 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या असतील.
दिल्ली येथील अकाउंटीबिलिटी इनिशिएटिव्हचे सल्लागार टी. आर. रघुनंदन यांचे बीजभाषण होईल. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 नोव्हेंबरला दुपारी 3.45 वाजता परिषदेचा समारोप होईल. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार या वेळी प्रमुख पाहुणे असतील.
नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे समारोपाचे भाषण होईल. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे या वेळी उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले.
सहा चर्चासत्रे
परिषदेत सहा विषयांवर चर्चासत्रे होतील. त्यात निवडणूक सुधारणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन आणि राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उल्लेखनीय कार्य, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा प्रभावी सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यप्रणाली, निधी व अधिकार आदी विषयांचा समावेश असेल. 73 व 74 व्या घटना दुरुस्तीची आतापर्यंतची वाटचाल आणि भावी दिशा काय असावी, याबाबत या परिषदेत विचारमंथन होईल.
|