मुंबई - बहुचर्चित महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम टप्प्यात असून, आज मंत्रालयात मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या उपस्थितीत त्यावर अंतिम सुधारणा करण्यात आल्या. काही माफक व तांत्रिक सुधारणा करून हा आराखडा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी 68 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरातील दर्शन मंडप, परिसर सुशोभीकरण, पार्किंग सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, दिशादर्शक फलक या सुधारणा करण्यात येणार आहेत. या आराखड्याचे आज मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासमोर सादरीकरण झाले. या वेळी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कोल्हापूरचे आयुक्त अभिजित चौधरी, देवस्थान समितीचे सचिव विलास पाटील उपस्थित होते. या आराखड्यात मुख्य सचिवांनी काही किरकोळ बदल सुचवले. त्यामुळे या नवीन सुधारणांसह हा आराखडा अंतिम केला जाणार असून, त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
|