मुंबई - महाराष्ट्रातील विविध प्रश्न संसदेत मांडून विविध लोकोपयोगी कामांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा, यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाशी निगडित जे मुद्दे खासदारांनी मांडले, ते संबधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही अहवाल पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री राम शिंदे, सर्वपक्षीय खासदार, मुख्य सचिव सुमीत मल्लिक या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील खासदारांनी आतापर्यंत 561 मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी 431 मुद्यांबाबत कृती अहवाल सादर करण्यात आला आहे. जे काही प्रलंबित मुद्दे आहेत त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन ते सोडविण्यात येतील.
या बैठकीत खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, कपिल पाटील, सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, अनिल शिरोळे, माजिद मेनन, राजीव सातव, शरद बनसोडे, प्रतापराव जाधव, अनिल देसाई, डॉ. विकास महात्मे, रामदास तडस, हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. सुनील गायकवाड, किरीट सोमय्या, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, अशोक नेते, ए. टी. पाटील, डॉ. प्रितम मुंडे, डॉ. श्रीकांत शिंदे, चंद्रकांत खैरे, हुसेन दलवाई, गोपाळ शेट्टी, आनंदराव अडसूळ, अजय संचेती, विनायकराव राऊत, कृपाल तुमाने, हेमंत गोडसे यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते, रेल्वे पूल, जलसंधारणाची कामे, विमानतळ आदींबाबत मुद्दे मांडले. राज्य शासनच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
|