मुंबई - राज्यात पोस्टमनची दोन हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी 350 पदांची भरतीप्रक्रिया येत्या रविवारी (ता. 5) नोव्हेंबरला होणार आहे.
पोस्टाच्या रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत.
टपाल विभागाकडून सतराशे पोस्टमन आणि पाचशे मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परीक्षाही त्रयस्थ संस्थेमार्फत घेण्यात आली होती; परंतु परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्याने पोस्टाने ही भरती प्रक्रिया रद्द केली. याबाबतची एक याचिकाही उच्च न्यायालयात टपाल विभागाने दाखल केली आहे. सध्या राज्यातील पोस्टमनची कमतरता ग्रामीण डाक सेवकांच्या मदतीने भरून काढण्यात येत आहे.
टपाल विभागाची 2015 मधील मोठी भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. यापूर्वीच्या 2 हजार 200 पदांच्या भरती प्रक्रियेत देशभरातील साडेतीन लाख उमेदवार सहभागी झाले होते. त्रयस्थ संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना वाढीव गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे. पुन्हा नव्या संस्थेकडे ही भरती प्रक्रिया देण्याचा विचार विचार सुरू आहे.
लिपिक पदे भरणार
पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट अशा दोन पदांसाठी टंकलेखन आणि संगणक फेरपरीक्षा तिसऱ्यांदा घेण्यात आली. या परीक्षेमुळे 2014 पासूनची रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तेराशे पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
|