मुंबई - पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यांमध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील गडांवर पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 5 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, कंपन्या यांच्या उपस्थितीत काल हॉटेल ट्रायडंट येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
पर्यटकांना सवलत
पर्यटन पर्वाच्या काळात "एमटीडीसी'च्या रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात यावी, अशी सूचना या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केली. राज्यात या सर्व प्रकारच्या पर्यटन क्षेत्रात मोठा वाव आहे. पर्यटन पर्व काळात पर्यटनाच्या या नवीन क्षेत्रांना उजाळा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
|