प्रवाशांना 31 टोल नाक्यांद्वारे दीड हजाराचा भुर्दंड
मुंबई - राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील टोलवसुलीला प्रवासी कंटाळले असतानाच, राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरही "टोल'धाड पडणार आहे. या महामार्गावर एकूण 31 टिकाणी टोल नाके उभारण्यात येणार असल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी "टोलमुक्त महाराष्ट्रा'चे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोल नाके प्रस्तावित आहेत, अशी माहिती पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मागितलेल्या माहितीमध्ये समोर आली आहे.
शिवसेना भाजप सरकारने मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाची घोषणा केल्यानंतर अनेक कारणांनी हा महामार्ग वादात सापडला आहे. तब्बल 47 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या महामार्गाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन रखडले असताना, टोल आकारणीमुळे या प्रकल्पाला पुन्हा विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नव्याने होत असलेल्या मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोल नाके उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती शिरोडकर यांनी मागितलेल्या माहितीमुळे उजेडात आली आहे. आगामी काळात समृद्धी महामार्ग हा प्रकल्प तयार झाला तरी त्यावरून मुंबई ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सुमारे दीड ते दोन हजार रुपये इतका टोल भरावा लागणार आहे. मुंबई ते नागपूर असा जवळपास 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा "स्वप्नातील प्रकल्प' म्हणून हा प्रकल्प ओळखला जात आहे. हा प्रकल्प जमीन संपादनाच्या वादावरून चर्चेत असून, विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध करीत आंदोलने केली आहेत. हा प्रकल्प पाच भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची घोषणा करण्यात आल्यानंतर या महामार्गावरील टोल नाक्यांची माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र या उघड झालेल्या माहितीमुळे विरोध वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
|