मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असूनही अद्याप शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारायण राणे यांनी उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे राणे यांना तूर्तास उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, आता शिवसेनेला मान्य होईल असा उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील व विनोद तावडे यांनी "मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, ठाकरे यांनी अधिकृतपणे शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे, शिवसेनेची भूमिका गुलदस्तातच असल्याने भाजपसमोर पेच उभा राहिल्याचे चित्र आहे.
भाजपने शिवसेनेला विश्वासात न घेता उमेदवार दिला, तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर एखादा तगडा अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्यास शिवसेनेची साथ मिळू शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे, कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असे समीकरण अपक्ष उमेदवरासाठी समोर आल्यास भाजपचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. शिवाय मोठ्या प्रमाणात "घोडेबाजार' होण्याची भीती असून, हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शिवसेनेच्या पसंतीस उतरेल असा उमेदवार देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
तर निवडणूक बिनविरोध...
सत्तेत कायम शिवसेनेवर कुरघोडी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत शिवसेनेची मदत आवश्यक आहे. शिवसेनेने भाजपला अधिकृत पाठिंबा दिला तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपचे 123 व शिवसेनेचे 63 हे संख्याबळ इतर कोणत्याही उमेदवाराला मोडीत काढणे अशक्यच आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या समन्वयाने भाजपचा उमेदवार निश्चीत करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
|