पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारपासून दौरा
मुंबई - राज्य सरकारच्या तीन वर्षांतील कारभाराचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात लेखाजोखा मांडत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. ते शुक्रवार (ता. 24) पासून तीन दिवसांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यामध्ये ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. राज्य सरकारच्या कारभारावरही टीकास्त्र सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी चांदा ते बांदापर्यंत दौरे आखले आहेत. आठवड्यापासून पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडत आहेत. 1 ते 11 डिसेंबरदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने यवतमाळ ते नागपूरपर्यंत पदयात्रेचे आयोजन केले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनावर पदयात्रा पोचल्यानंतर जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे हे 24 ते 26 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पक्षाच्या आमदार, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात सहा, सांगली व साताऱ्यात प्रत्येकी एक आमदार असून, त्यांना आगामी निवडणुकीचा कानमंत्र देणार आहेत. शिवसेना राज्याच्या सत्तेत असली तरी सरकारच्याच विरोधात टीका करण्याची संधी ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी सोडली नाही.
|