मुंबई - राज्य विधानमंडळाचे तिसरे (पावसाळी) अधिवेशन येत्या 24 जुलैपासून सुरू होणार असून, ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 19 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सुट्यांचे चार दिवस असून एकूण कामकाजाचे 15 दिवस असणार आहेत.
कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधिमंडळ कार्यमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विधानसभेतील पक्षांचे गटनेते व वरिष्ठ सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे कामकाज ठरविताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधिमंडळ कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधान परिषदेतील सर्व पक्षांचे गटनेते, वरिष्ठ सभासद उपस्थित होते.
शनिवार, 29 जुलै रोजी बैठक होणार नाही तर रविवार, 30 जुलै आणि रविवार, सहा ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुटी असणार आहे. सोमवार, सात ऑगस्ट रोजी येणाऱ्या रक्षाबंधन सणामुळे कामकाज होणार नाही. त्या ऐवजी शनिवार, पाच ऑगस्ट रोजी कामकाज सुरू राहणार आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.
|