मुंबई - वीजबिलांची थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार "मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना' जाहीर करत असून, यामुळे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज वगळून मूळ थकबाकी पाच समान हप्त्यांत भरता येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे म्हणाले, की या योजनेत 30 हजारांहून कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांकडील थकबाकीच्या मूळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले आहेत. 30 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना मूळ थकबाकी ही 10 समान हप्त्यांत भरावयाची आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू बिल नोव्हेंबर 2017 पर्यंत भरून डिसेंबर 2017 पासून मूळ थकबाकींपैकी 20 टक्क्यांचा पहिला हप्ता भरावा लागेल. त्यानंतर मार्चमध्ये 20 टक्के, जूनमध्ये 20 टक्के, सप्टेंबरमध्ये 20 टक्के व डिसेंबरअखेर 20 टक्क्यांसह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे.
या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याचा विचार सरकार करत आहे, असे त्यांनी नमूद केले.
|