मुंबई - पुण्यातून अटक करण्यात आलेले पाच बांगलादेशी नागरिक "अल कायदा' या दहशतवादी संघटनेशी संबंधित अन्सारुल्लाह बांगला टीमच्या (एबीटी) सदस्यांना आश्रय देत होते, असा दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) संशय आहे. त्यांचा म्होरक्या राज मंडल दोन वर्षांपासून पुण्यातील संरक्षण ठिकाणांवरील बांधकाम साइटवर कामाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोहम्मद हबीबुर रेहमान हबीब ऊर्फ राज मंडल (31), मोहम्मद रिपान हुसैन ऊर्फ रुबेल दलाल (25), हनन अन्वर खान ऊर्फ हनन बाबूराली गाझी (25), मोहम्मद अझराली मोहम्मद सुभानुल्ला ऊर्फ राजा मंडल (30) आणि मोहम्मद हसनअली मोहम्मद आमीर अली (24) या "एटीबी'शी संबंधित पाच बांगलादेशी नागरिकांना "एटीएस'ने नुकतीच पुण्यातून अटक केली. दोन वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या टोळक्याचा म्होरक्या राज मंडल संरक्षण ठिकाणावर सुरू असलेल्या बांधकामस्थळी सुपरवायझर म्हणून कामाला होता. या दोन वर्षांत या पाच जणांनी आधार कार्ड व पॅन कार्डसारखी ओळखपत्रेही बनवली होती. बोधगया येथे झालेल्या बॉंबस्फोटात "एबीटी'चा हात असल्याचे उघड झाले आहे.
डोकेदुखी वाढणार
"एबीटी'ने आपल्या हस्तकांकडून महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यातच "एबीटी'शी संबंधित संशयितांना पुण्यातून अटक झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिकच सावध झाल्या आहेत. या संशयितांवर "एबीटी'ने कोणती जबाबदारी सोपवली होती, याचा तपास "एटीएस' करत आहे. "एबीटी'चे हस्तक आयईडीच्या माध्यमातून बॉंबस्फोट घडवण्यात सराईत असल्यामुळे भविष्यात ही संघटना भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.
|