समृद्ध जीवनप्रकरणी कायद्यात बदल

समृद्ध जीवनप्रकरणी कायद्यात बदल

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; ठेवीदारांचे पैसे परत देणार

मुंबई - "समृद्धी जीवन'चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्यावर ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे; परंतु ठेवीदारांना अद्यापही पैसे दिले गेले नसल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसंगी कायद्यात बदल करू आणि "समृद्धी जीवन'च्या जप्त संपत्तीची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देऊ, असे आश्‍वासन या वेळी दिले. 

पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाच्या कामकाजामध्ये प्रश्नोत्तर सत्रामध्ये आमदार सुभाष साबणे आणि किशोर पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. 

आमदार साबणे म्हणाले, ""समृद्धी जीवन समूह आणि त्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश मोतेवार यांनी राज्य आणि परराज्यातील तब्बल 20 लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. भरमसाट व्याज देण्याच्या आमिषापोटी विविध संस्थांच्या माध्यमातून ही फसवणूक केली. ज्या ठेवीदारांनी पैसे गुंतविले होते, त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यावर सरकारने नेमकी काय कार्यवाही केली आहे.'' 

आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ""समृद्धी जीवनसारख्या पुण्यात अनेक चिटफंड कंपन्यांनी हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. जिल्हाधिकारी यांना मालमत्ता, संपत्ती जप्तीचे अधिकार असताना तशी कारवाई केली जात नाही. त्यामुळे हवाला घोटाळ्याचीदेखील चौकशी आणि दोषींवर कारवाई करावी.'' 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ""भविष्यातील आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी चिटफंड आणि अन्य कंपन्यांवर कारवाईसाठी विशेष शोध पथक स्थापन करावे, तसेच सीआयडीला अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे.'' 

तसेच आमदार राहुल मोटे, आशिष शेलार, जयप्रकाश मुंदडा यांनीदेखील गुंतवणूकदारांना पैसे देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत विचारणा केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ""समृद्धी जीवन'वर ईडीच्या माध्यमातून कारवाई झाली आहे. मोतेवार यांच्या नावावर तसेच अन्य लोकांच्या नावे केलेली संपत्ती, मालमत्ता जप्त केली आहे. विविध कायद्यांच्या तरतुदीनुसार कारवाई केली जात आहे. ज्या ठेवीदारांनी गुंतवणूक केली असेल त्यांना त्यांचे पैसे परत दिले जातील.'' 

तसेच हवाला घोटाळ्यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांना संबंधितांची चौकशी करून मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्याचेदेखील सांगितले. 

नोबेलाचा प्रकल्प बंद करावा 
कोथरूड येथे नोबेल कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प अशास्त्रीय पद्धतीने चालविला जात आहे. त्यामुळे विषारी वायू, दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मळमळ, उलटी, डोकेदुखी, निद्रानाश, अकाली प्रसूतीसारखे धक्कादायक प्रकार होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रक्रिया प्रकल्प तातडीने बंद करण्यासंदर्भात आदेश द्यावा, असा औचित्याचा मुद्दा आमदार मेधा कुलकर्णी यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला. 

शासकीय इतमामात व्हावी नाईक जयंती 
पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे शासकीय इतमामात आद्य स्वातंत्र्यसैनिक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी, अशी मागणी बेरड आणि रामोशी समाज बांधवांकडून केली जात आहे. त्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 75 हजार लोकांचा मोर्चादेखील काढण्यात आला होता. 7 सप्टेंबर रोजीची जयंती आणि उचित समाधी स्मारक उभारण्याची मागणी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com