भाजप नेत्यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण

Ashok-Chavan
Ashok-Chavan

मुंबई - स्वत:च्या संघटनेचा पूर्वेतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि सरकार चालवण्यात अपयश आल्याने द्वेष व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजप नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करीत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे, अशी कडवट टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनचरित्रांवर आधारित पुस्तकांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय म्हणजे "विनोद'च आहे, अशी उपहासात्मक टीका करून चव्हाण यांनी सांगितले, की नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व नेते आत्मस्तुतीत गुंग झाले आहेत. खादी ग्रामोद्योग विभागाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधीजींचे छायाचित्र काढून व स्वतः चरखा चालवत असल्याचे छायाचित्र टाकणे, देशासाठी कोणतेही योगदान नसलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या नेत्यांच्या जीवनचरित्रांवरील पुस्तकांवर कोट्यवधीची उधळपट्टी करणे व देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या महापुरुषांची नावे हटवून जनतेच्या मनात आदराचे स्थान नसलेल्या नेत्यांची नावे विविध योजनांना देणे, असे प्रयत्न या सरकारने वेळोवेळी केलेले आहेत.

महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने महात्मा गांधी, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यावरील खर्च कमी केला आहे. परंतु गांधी, फुले, आंबेडकर ही केवळ नावे नसून त्यांचे थोर विचार, देश व समाजाकरिता केलेला प्रचंड मोठा त्याग व महान कर्तृत्व त्याबरोबर जोडलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांच्या विचारांचा सुगंध वादातीत असून आताच्याच नव्हे; तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांच्या हृदयातून ही नावे पुसणे अशक्‍य आहे.

गांधीजींच्या विचारांना विरोध करण्याची क्षमता नव्हती, म्हणून गांधीहत्या करण्यात आली. पण त्यांच्या विचारांची हत्या करता आली नाही. गांधीजींचे विचार जगाने आत्मसात केले, म्हणूनच पुस्तकाच्या पानांमधून त्यांची नावे खोडण्याचा प्रयत्न करण्याच्या कृतीने भाजप नेत्यांना विकृत आनंद मिळेल; परंतु ही नावे जनतेच्या हृदयातून कशी काढू शकाल? असा प्रश्न विचारून असे प्रयत्न जगाच्या व देशाच्या दृष्टिकोनातून हास्यास्पद व दयनीय ठरत आहेत, असे चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com