मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयाच्या दारात आत्महत्येचा प्रयत्न अशा घटनांबरोबरच सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फडणवीस सरकार राज्यातील नागरिकांबरोबर "ब्ल्यू व्हेल गेम' खेळत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
अविनाश शेटे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सावंत यांनी सांगितले की, या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उच्चांक मोडला आहे. साडेतीन वर्षांत 13 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात आता सुशिक्षित बेरोजगारांचीही भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या आणि युवकांना रोजगार देण्याच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. बेजबाबदार कृत्ये करून आणि चुकीची धोरणे राबवून हे सरकार राज्यातील जनतेशी खतरनाक "ब्ल्यू व्हेल गेम' खेळत आहे, असे सावंत म्हणाले.
|