गारपिटीचा सव्वा लाख हेक्‍टरला फटका - पांडुरंग फुंडकर

Pandurang-Phundkar
Pandurang-Phundkar

मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यांतील सुमारे 50 तालुक्‍यांतील 1086 गावांमधील एक लाख 24 हजार 294 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती व जालना जिल्ह्यांना बसल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई आणि शिरूर या तीन तालुक्‍यांतील 42 गावांतील 10 हजार 632 हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून, यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर व अंबड या पाच तालुक्‍यांतील 175 गावांमधील 32 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्‍यांतील 23 गावांतील तीन हजार 595 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहेत. जालना व परभणी जिल्ह्यांतही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्‍यांतील 38 गावांचा नुकसान झालेल्यांत समावेश असून, दोन हजार 495 हेक्‍टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दहा तालुक्‍यांतील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्‍टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळे व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुरजी व चिखलदरा या आठ तालुक्‍यांतील 270 गावांतील 26 हजार 598 हेक्‍टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्‍यांतील 101 गावांतील चार हजार 360 हेक्‍टरवरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्‍यांतील 36 गावांमधील आठ हजार 509 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्‍यांतील 59 गावांतील दोन हजार 679 क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. उमरगा व उस्मानाबाद या दोन तालुक्‍यांतील 26 गावांमधील 583 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा या दोन तालुक्‍यांतील 30 गावांमधील 143 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण 1086 गावांतील एक लाख 24 हजार 294 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून, क्षेत्रीय स्तरावरून पुढील दोन ते तीन दिवसांत नुकसानाचा
परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे फुंडकर यांनी सांगितले.

बसलेला फटका...
11 जिल्हे
50 तालुके
1086 गावे

जिल्हानिहाय नुकसान...
- बुलडाणा - 32 हजार 700 हेक्‍टर
- अमरावती - 26 हजार 598 हेक्‍टर
- अकोला - 4360 हेक्‍टर
- वाशीम - 8509 हेक्‍टर
- बीड - 10 हजार 632 हेक्‍टर
- जालना - 32 हजार हेक्‍टर
- परभणी - 3595 हेक्‍टर
- लातूर - 2679 हेक्‍टर
- हिंगोली - 143 हेक्‍टर
- जळगाव - 2495 हेक्‍टर

गारपिटीचा फटका
11 जिल्हे
50 तालुके
1086 गावे
1,24,294 हेक्‍टर क्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com