मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत 31 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली.
या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47.73 लाख खात्यांवर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजूर केला असून, त्यासाठी सुमारे 23 हजार 102 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 5 फेब्रुवारीअखेर 31.32 लाख कर्ज खात्यांवर लाभापोटी 12 हजार 362 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या एकूण 47.73 लाख कर्ज खात्यांपैकी बॅंकांकडून काही खात्यांवरील माहिती अद्ययावत करून पुन:श्च पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या ज्या शेतकऱ्यांची माहिती बॅंकेकडील माहितीशी जुळली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यांच्या माहितीची शहानिशा करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असून अशा तालुकास्तरीय समितीद्वारे निर्णय प्रक्रियेसाठी 21.69 लाख कर्जखाती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यापैकी बॅंकांनी 5 फेब्रुवारीअखेर एकूण 5.65 लाख खात्यांची माहिती अपलोड केलेली आहे.
|