मुंबई - गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची रायगड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत चव्हाण यांनी विजयी संपादन केल्यामुळे त्यांना पालकमंत्रिपदाची बक्षिसी दिल्याचे मानण्यात येते.
गृहनिर्माणमंत्री मेहता हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले होते. तसेच रायगड जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती. तसेच अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यामुळेही वादात सापडले होते, या सगळ्या कारणांमुळेच त्यांना पालकमंत्रिपदावरून हटविण्यात आल्याची चर्चा आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे अन्न व नागरीपुरवठा, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचे राज्यमंत्रिपद आहेत. रायगड जिल्हयातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणूक प्रभारी म्हणून चव्हाण यांची नियुक्ती केली होती. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते, तसेच ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हयाचं संपर्कमंत्री म्हणूनही चव्हाण यांच्यावर जबाबदारी आहे. रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार पाडण्यात रवींद्र चव्हाण हे यशस्वी झाले होते.
|