'सौभाग्य'तून महावितरण देणार 11 लाख 64 हजार जोडण्या
मुंबई - सौभाग्य योजनेअंतर्गत राज्यात 11 लाख 64 हजार 135 लाभार्थींना वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. यापैकी सात लाख 67 हजार 939 लाभार्थींना पारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून, तर 21 हजार 56 लाभार्थींना अपारंपरिक स्त्रोतातून वीजपुरवठा करण्यात येईल.
दारिद्य्ररेषेखालील घरे आणि सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील तीन लाख 96 हजार 196 घरांना वीजपुरवठ्याचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरातील अंतर्गत वाहिन्यांसह एक चार्जिंग पॉईंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजनेसह इतर योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांनाही मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
...अशी आहे योजना
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून, इतर लाभार्थींना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे 500 रुपये संबंधित लाभार्थीने त्याच्या बिलातून 10 टप्प्यात भरावयाचे आहेत. 31 डिसेंबर 2018 पर्यंत राज्यात 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वीजपुरवठ्यासाठी संपर्क
राज्यातील ज्या नागरिकांकडे वीजपुरवठा नाही, अशा नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात किंवा 18002003435/18002333435 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
|