मुंबई - शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना शिक्षणाची पुन्हा संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या मंडळाकडून बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठी पाचवी, आठवी, दहावी व बारावी या वर्गांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी 10 व 12 वी परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही मुक्त विद्यालयाचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे पाच लाख मुलांची शिक्षणातून होणारी गळती थांबविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रयत्न होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाकडून गेली कित्येक वर्षे बहिःस्थ विद्यार्थी योजना म्हणजेच खासगी विद्यार्थी थेट परीक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत 17 क्रमांकाचा अर्ज भरून बाहेरील मुले दहावीच्या परीक्षेस दाखल होतात. हे प्रमाण दरवर्षी जवळपास एक ते दीड लाख विद्यार्थी इतके आहे. मात्र, विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण या योजनेत जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे नियमित विद्यार्थ्यांसाठी जे विषय, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके आहेत, तीच बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येतात.
औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती सुरू करणे, शालेय शिक्षणातील गळती आणि नापासी कमी करणे, प्रौढ कामगार, प्रौढ आदिवासी, गिरिजन, गृहिणी या सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, सुशिक्षित आणि जागरूक नागरिक बनविणे, स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ही उद्दिष्टे ठेवून मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी सोयीनुसार अध्ययन करू शकणार असून, लवचिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यांकन होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. हे मंडळ राज्य शिक्षण मंडळाचा भाग म्हणून कार्यरत असेल.
|