मुंबई - विमान प्रवाशांच्या जिवाची काळजी घ्यायची की, विमानतळ परिसरातील रहिवाशांच्या जिवाची? याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने विचारपूर्वक करायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले.
विमानतळ परिसरातील टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. विमानतळ परिसरात उंच इमारतींना परवानगी देता येत नाही. तरीही मुंबईत अशा प्रकारे इमारती बांधण्यात आल्या आहेत, याची दखल घेणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते ऍड. यशवंत शेणॉय यांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या इमारतींमुळे विमान उड्डाणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे त्या पाडण्याची आवश्यकता आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. नागरी उड्डाण मंत्रालयासह प्राधिकरणाने याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई तातडीने सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. 2015-16 या काळात बांधलेल्या या इमारतींनाही नोटीस बजावण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.
|