मुंबई - प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकांनी कापडी पिशव्या तयार कराव्यात, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. मंत्रालयात आज प्लॅस्टिक उद्योजकांच्या शिष्ट मंडळासोबत चर्चा करताना ते बोलत होते.
कदम म्हणाले, 'प्लॅस्टिक उद्योजकांना त्यांच्याकडील शिल्लक असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या नष्ट करण्यासाठी निश्चितच काही कालावधी दिला जाईल. त्याचबरोबर कुठलेही प्लॅस्टिकचे उत्पादन, कॅरिबॅग निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.
आपल्याकडे दररोज अकराशे टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट कशी लावावी, हा मोठा प्रश्न आहे. भविष्यात आरोग्याचा मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्लॅस्टिक बंदीला पाठिंबा देऊन समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अनेक महिला बचत गटांनी कॅरिबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या बनविणे सुरू केले आहेत. जे उद्योजक कॅरिबॅग तयार करायचे त्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याकडे वळले पाहिजे. त्यासाठी सरकार नक्कीच मदत करेल. राज्यातील प्लॅस्टिक कारखान्यात काम करणारे जे कामगार असतील व प्लॅस्टिक बंदीमुळे बेरोजगार होणार असतील तर त्यांच्याबाबतीतही योग्य निर्णय घेऊ. अशा कामगारांची यादी प्लॅस्टिक उद्योजकांनी द्यावी, असेही कदम यांनी सांगितले.
|