मुंबई - राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये किराणा भुसारच्या सामानांची विक्री करण्याबरोबरच या दुकानचालकांचा मोबदला दुप्पट करण्याचा मनोदय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
राज्यात शिधावाटप दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविल्यामुळे 23 ते 24 लाख बनावट शिधापत्रिका आढळल्या आहेत. यामुळे एकूण शिधावाटपाच्या एक चतुर्थांश धान्याची बचत होणार असल्याची माहिती बापट यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करत, बायोमेट्रिकमध्ये शिधापत्रिकाधारकाचे ठसे अनेकदा स्कॅन होत नाहीत, त्यामुळे गोरगरिबांना अन्नधान्य मिळत नाही, हा मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना बापट यांनी राज्यातल्या 53 हजार दुकानांपैकी काही दुकानांमधे ठसे स्कॅन होत नाहीत हे मान्य केले. राज्यात आतापर्यंत सुमारे 88 टक्के शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडल्या गेल्याचे ते म्हणाले.
|