मुंबई - राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यासाठी अलीकडेच मंत्रालयात असलेल्या मध्यवर्ती कार्यालयातील रिक्त नऊ जागा भरल्या आहेत.
मॉन्सूनचे आगमन होण्याअगोदर मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष विविध विभागांच्या आढावा बैठक घेते. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरवात होते. त्यामुळे आपत्तीनिवारण यंत्रणेला जून महिन्यापासून सज्ज व्हावे लागते.
त्यामुळे आपत्तीनिवारण कक्षातील नऊ जागांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये प्रकल्प अधिकारी आणि समन्वयक या पदांचा समावेश आहे. त्याचबरोबर आपत्तीनिवारण कक्षाचे काम बऱ्याचदा उपग्रहाच्या मदतीने चालते. मंत्रालयाला लागलेल्या आगीत उपग्रह संदेशवहन यंत्रणा निकामी झाली होती. त्यानंतर ती दुरुस्त केली असली तरी तिचा पूर्ण क्षमतेने वापर या वर्षीपासून केला जाणार आहे; तसेच मुंबई महापालिका, अग्निशमन दल, सावधानतेचा इशारा, हवामान खात्याची रोजची आकडेवारी, पावसाचे प्रमाण याचा रोज अंदाज घेतला जाणार आहे; तसेच हेल्पलाइन, मेसेज या माध्यमातून नागरिकांना सूचना दिल्या जाणार आहेत.
चार वर्षांपासून आपत्ती विभागाची डिरेक्टरी अद्ययावत नव्हती. ती या वेळी अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये विविध विभागांच्या हेल्पलाइनसह त्या त्या विभागांच्या अधिकाऱ्यांपासून प्रमुखांपर्यंत सर्वांचा ई-मेल, संपर्क क्रमांक यांचा समावेश आहे.
|