नागपूर - 'गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला असला तरी तोडीची लढत दिली. यामुळे पक्षात चैतन्य व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, याचा फायदा भविष्यात पक्षाला होईल; तसेच गळतीही थांबेल,"" अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातच्या निकालावर सोमवारी दिली.
राहुल गांधी यांनी "भाजप सूट व बूट'चा पक्ष असल्याची टीका केली होती. गुजरातमध्ये सुरवातीला अनेक मतपेट्या कॉंग्रेसच्या बाजूने उघडल्या. त्या वेळी शेअर बाजार कोसळला. नंतर भाजप असल्याचे चित्र येताच पुन्हा तेजी आली. यावरून व्यापारी व उद्योगपतींचा भाजपशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते. निवडणुकीत कॉंग्रेसला ग्रामीण भागात चांगले समर्थन मिळाले. ग्रामीण भागातील नागरिकांनी सरकारच्या कृषी धोरणाला नाकारल्याचे स्पष्ट होते. भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. आता ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याने पुढच्या निवडणुकीत कॉंग्रेसला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस सोडण्यासाठी दबाव
निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस नेत्यांवर पक्ष सोडण्यास दाबाव टाकला होता. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भाजपच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गुजरातमध्ये फोडाफाडीने भाजपला फारसा फायदा झाल्याचे दिसून येत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
|