राज्य सरकारकडून राहुल गांधी आणि काँग्रेसकडून होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान बघता जनतेला त्यांच्या स्वतंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा हे कुठे होते अशी घणाघाती टीका आज (३० मार्च) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिदें-भाजप सरकारवर केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. यादरम्यान अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते नाशिक येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
अजित पवार काय म्हणालेत...
अजित पवार म्हणाले की, जे सवारकरांबद्दल बोललं गेलं हे बोलायला नको होतं. आम्हाला सगळ्या महापुरूषांबद्दल अभिमान आहे. त्यांनी केलेलं काम तरुण पिढीला उर्जा देणारं आहे. काहींनी बोलायला नको होतं पण बोलले, त्यानंतर त्यांना याबद्दल सांगितलं. ते म्हणाले आता बोलणार नाही. त्यानंतर आता गौरव यात्रा काढणार.
अजित पवार म्हणाले की, गौरव यात्रा काढायचं आता सुचलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा गौरव काढण्याचं सुचलं नाही. मतं मागण्याच्या वेळी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. हे कुठलं दुटप्पी राजकारण असा सवाल देखील अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारला आहे.
सावरकर गौरव यात्रा
सरकारकडून काढण्यात येणाऱ्या ही सावरकर गौरव यात्रा राज्यभरातील २८८ मतदारसंघात काढण्यात येणार आहे. या यात्रेची जबाबदारी वेगवेगळय़ा विभागासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. तसेच या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.