
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. . मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली. यानंतर सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे हिंगोली येथे भुजबळांनी विचारात बदल करावा असे विधान केले होते. यानंतर भुजबळांनी जरांगे यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास मी विरोध केला नाही. मराठा समाजाला निश्चित आरक्षण द्या. ज्यावेळी फडणवीसांनी यासंबंधीचं विधेयक समोर आणलं त्याला देखील मी पाठिंबा दिला. एवढंच आहे की, ओबीसीचं आरक्षण फार कमी आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे. पाऊणे चारशे जाती आहेत. १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिलं आहे, म्हणून त्यांना वेगळं आरक्षण द्या. त्यासाठी असलेली अडचण दूर करा असं माझं मत आहे असे भुजबळ म्हणाले.
तसेच हे माझ्या एकट्याचं मत नाही. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देता कामा नये, हे मुख्यमंत्र्यांचं देखील मत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, नाना पटोले, अशोक चव्हाण यांचं देखील हेच मत आहे. मग मलाच एकट्याला का बोलता? माझ्या एकट्याच्या हातात काय आहे. ही सगळी मंडळी त्याच मताची आहेत, हेच मला जरांगेना सांगायचं आहे. मग तू त्यांची नावे घेऊन का नाही बोलत. इशारे द्यायचे असतील तर द्या पण सर्व पक्षाचे नेते त्याच मताचे आहेत. या मताच्या कोण विरोधात आहे ते सांगा, असे भुजबळ म्हणाले आहेत.
जरांगे काय म्हणाले होते?
काल हिंगोली येथे बोलतना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने सर्व पक्षांना, नेत्यांना मोठे केले. मात्र, या समाजाला द्यायची वेळ आल्यावर नकार का दिला जातो, मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, सरकारची आरक्षण देण्याची इच्छाच नाही. आमच्या हक्काचे आरक्षण आम्ही मिळविणारच. भुजबळ मोठे नेते आहेत. त्यांना मोठे करण्यामध्ये मराठा समाजाचाही वाटा आहे. मात्र, त्यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणे चुकीचे आहे. त्यांनी त्यांच्या विचारात बदल केला पाहिजे.