राजकारणात मैदान सोडायचे नसते, मी धावतच राहणार : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दमले असे सुशीलकुमार शिंदे असे का म्हणाले मला माहिती नाही. राजकारणात मैदान कधी सोडायचे नसते. मैदान सोडण्याची स्थिती माझीतरी नाही. म्हातारा झालो अशी स्थिती माझी नाही. मी धावतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आज (बुधवार) शरद पवार यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले, ''आम्ही अनेक वर्षे सत्तेत होतो त्यानंतर आता सत्तेशिवाय राहण्याचा प्रसंग आल्याने अनेकांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांना सत्तेत राहण्याचा मोह आवरला नसल्याने त्यांनी निर्णय घेतले. तसेच चौकशीला काही समोर जावे लागेल अशी भीती होती. विचारधारा मानणारे लोक आजही पक्षात आहेत. ज्यांना जमले नाही त्यांनी पक्ष सोडले. आता नव्या पिढीचे नेतृत्व तयार केले पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अशा चौकश्या मागे लावल्या जातात. आता प्रफुल्ल पटेलांचा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव ईडीने घेतले आहे. पटेल यांनी 70 हजार जणांना रोजगार दिला आहे. माझ्यासोबतही ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मी ईडीला जाण्याचे मी ठरविले होते. त्यापूर्वी मला पोलिस आयुक्त भेटले आणि ते म्हणाले, की तुम्ही गृहमंत्री होता. लोक रस्त्यावर येतात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना होतो. त्यामुळे त्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली. माझ्या एका निर्णयाने कायदा-सुव्यवस्था बिघडणे योग्य नाही, असे वाटले. त्यामुळे मी ईडीला न जाण्याचा निर्णय घेतला.''

निवडणुकीच्या मैदानात समोर कोणीच नाही हे मुख्यमंत्र्यांचे विधान हास्यास्पद आहे. पहिल्यांदा सत्ता आल्याने अशी वक्तवे केली जातात. मी स्वतः कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्ती आम्ही तुल्यबळ माणसासोबत करू. मुख्यमंत्र्यांना आज ना उद्या कळेल. 2004 मध्येही देशात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तर, प्रमोद महाजन यांनी देशात इंडिया शायनिंग ही मोहिम राबविली होती. तरीही लोकांनी त्यांना घालविले होते. त्यामुळे सत्तेत कोणी कायम असू असे समजू नये. सभेत मी कोपराने एकाला ढकलले हा विषय पंतप्रधानांनी माझी एवढी दखल घेण्यासारखा विषय नाही. लहान मुलांसारखे असे विषय आणले जात आहेत, अशी खोचक टीका पवार यांनी केली. 

देशातील एक नंबरचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील आज कोणत्याही एमआयडीसीमध्ये जावा निम्मे कारखाने बंद आहेत. तीन शिफ्टमध्ये काम चालायचे ते बंद झाले आहे. अर्थव्यवस्था रसातळाला जातेय ही वस्तुस्थिती आहे. अर्थव्यवस्था सुधारणेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मजुरांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. नोबेल पुरस्कार विजेत्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केले आहे, असे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com