मुंबई - शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेच्या मतांची समीकरणे चुकली आहेत. युती झाली असती, तर दोन्ही पक्षांवरील नाराज मतदारांनी दुसरा पर्याय शोधला असता. त्याचा सर्वाधिक फायदा मनसेपाठोपाठ राष्ट्रवादीला झाला असता. आता ही शक्यता मावळली आहे.
युती झाली असती, तर भाजपवर नाराज असलेल्या मतदारांनी मनसेला साथ दिली असती. त्याचा फायदा त्यांना मतांची गणिते जुळवण्यात झाला असता, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेवर नाराज असलेल्या अमराठी मतदारांनी भाजपला मते न देता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला असता, असा दोन्ही पक्षांचा अंदाज होता; परंतु युती तुटल्यामुळे त्यांच्या अंदाजांना काहीही आधार उरलेला नाही.
शिवसेनेवर नाराज असलेला उत्तर भारतीय मतदार आता दुसरा पर्याय शोधणार नाही, तर तो भाजपलाच मतदान करेल, असे निरीक्षण आहे. मराठी मतदारांबाबतही अशीच परिस्थिती आहे. भाजपवर नाराज असलेला मतदार मनसेकडे न वळता शिवसेनेच्या पारड्यात मते टाकील, असा अंदाज आहे. विधानसभेच्या निवडणुकीत असेच समीकरण जुळल्यामुळे शिवसेना-भाजपमध्येच लढाई झाली होती. त्यामुळे मनसेच्या विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेकडे आल्या होत्या. महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
|