'देशात 'एनडीए'ला काठावरचे बहुमत; राज्यात युती झाली तरच सत्ता'

Nandkishor-Jakatdar
Nandkishor-Jakatdar

भडगाव - केंद्रात भाजप व मित्रपक्षाला (रालोआ) काठावरचे बहुमत मिळेल आणि त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे भाकीत बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी वर्तविले. मात्र,  हे सरकार अधिक काळ टिकणार नाही आणि २०२२-२३ मध्ये देशात मध्यावधी होतील. तसेच येत्या निवडणुकीत भाजपच्या ३०-४० टक्के जागा घटतील आणि काँग्रेसच्या आताच्या खासदारांच्या संख्येत वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. 

येथे बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या वतीने २४ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन कालपासून सुरू होते, त्याचा आज समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात सेना-भाजपची युती झाली, तरच युतीची सत्ता येईल अन्यथा काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी सत्ता स्थापन करेल, असा दावा देखील या अधिवेशनात करण्यात आला आहे.

१४ एप्रिल ते ३० मे दरम्यान लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून गेल्या वेळेपेक्षा भाजप व मित्रपक्षांच्या ३०-४० टक्के जागा घटतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ही भविष्यवाणी खरी ठरली, तर गेल्यावेळेपेक्षा भाजपच्या ८० जागा कमी होऊ शकतात. 

काँग्रेसच्या जागा वाढतील 
राहुल गांधींच्या पत्रिकेत इच्छाशक्तीचा ग्रह शनी हा तारक असल्याने गेल्यावेळेपेक्षा त्यांच्या पक्षाला जवळपास तीनपट अधिक जागा मिळतील असा अंदाज या अधिवेशनात व्यक्‍त करण्यात आला. प्रियांका गांधींमुळे काँग्रेसला लाभ होण्याचे संकेतही जकातदार यांनी दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लोकसभेत २० पेक्षा अधिक जागा मिळतील. भाजपला या निवडणुकीत राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात राज्यात फटका बसेल आणि पर्यायाने काँग्रेसला त्यांचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

१४ एप्रिल ते ३० मे दरम्यान पक्षाच्या व त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या ग्रहमानानुसार शास्त्रोक्त पद्धतीने लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या संदर्भात आम्ही वर्तवलेल्या निकालाचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. आम्ही भविष्य लॉजिकनुसार नव्हे, शास्राप्रमाणे सांगतो.
- नंदकिशोर जकातदार, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ

...तरच मोदी पंतप्रधान 
भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीसारखे प्रचंड यश मिळणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींची पुन्हा पंतप्रधान होण्याची वाट अवघड असल्याचे त्यांची ग्रहस्थिती सांगते. भाजपला २२० जागा मिळाल्या, तरच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील. त्यांना २०० जागा मिळाल्यास भाजपकडून पंतप्रधानपदासाठी अन्य उमेदवार पुढे येईल, असे ज्योतिष सांगत आहे.

मध्यावधी निवडणुकीचे संकेत ! 
भाजप व मित्रपक्षांना काठावरचे बहुमत मिळेल. त्रिशंकू अवस्थेमुळे २०२२-२३ मध्ये देशात मध्यावधी निवडणुका होतील. त्यावेळी राहुल गांधींची ताकद वाढलेली असेल. ते पंतप्रधानही होऊ शकतात.

राज्यात युती झाली तरच सत्ता 
राज्यात विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपची निवडणुकीत युती झाली, तर सत्ता स्थापन करता येऊ शकते. अन्यथा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येऊन ते सत्तेत येतील, असे भाकीतही या अधिवेशनात वर्तविण्यात आले. सध्याच्या सेना-भाजपच्या ग्रहमानानुसार त्यांची युती होईल, असे वाटते. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनाही आगामी काळात राजकीय यशाचे योग असल्याचे जकातदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com