संघर्ष यात्रेसाठी संघटनशक्ती वाढविण्याची गरज - चव्हाण 

संघर्ष यात्रेसाठी संघटनशक्ती वाढविण्याची गरज - चव्हाण 

सोलापूर - ""सध्या सुरू असलेल्या संघर्ष यात्रेने लगेच काही साध्य होणार नाही. हा संघर्ष कायम सुरू राहिला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात संघटन होणे आवश्‍यक आहे. त्यांच्या मुलांनीही या संघर्ष यात्रेत सहभागी झाले पाहिजे,'' असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

संघर्ष यात्रेचा रविवारी (ता. 2) सोलापुरात मुक्काम होता. सोमवारी सकाळी पंढरपूरला रवाना होण्यापूर्वी चव्हाण यांनी शासकीय विश्रामधाम येथे "सकाळ'शी संवाद साधला. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील व प्रा. जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ""संघर्ष यात्रेचा हा पाचवा दिवस आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सतत सुरू राहिले पाहिजे. संघटनशक्ती विशेषतः शेतकरी व त्यांच्या मुलांनी या संघर्ष यात्रेत सहभागी झाले पाहिजे.'' 

कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता आहे; मात्र पैसे नाहीत हे कारण सांगितले जाते. इतर ठिकाणी द्यायला सरकारकडे पैसे आहेत; मात्र कर्जमाफीसाठी नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे, ही रक्कम सरकारने कर्जरूपाने उभी करावी, त्यासाठी महसुली उत्पन्न वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता; मात्र निवडणुकीनंतर त्याचा त्यांना विसर पडला. कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांना पूरक साहित्य उपलब्ध केल्यास भाजप सरकारच्या कालावधीत शेतीचे 10 ते 12 टक्के उत्पन्न वाढेल. शेतीमध्ये सरकारने गुंतवणूक वाढविली पाहिजे, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे चव्हाण म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com