पुणे 11, मुंबई व कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 10 शाळा
नवी दिल्ली - निती आयोगाच्या "अटल इनोव्हेशन मिशन'अंतर्गत सुरू केलेल्या "अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 1 हजार 504 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील 116 शाळांचा समावेश असून, निती आयोगाने नुकतीच या संबंधीची घोषणा केली.
निती आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 11 शाळांचा समावेश असून, मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 10 आणि नाशिक जिल्ह्यातील 5 शाळा समाविष्ट आहेत.
सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने "अटल टिंकरिंग लॅब' उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी देशातील 928 तर, राज्यातील 75 शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता.
देशातील 388 जिल्हे व 79 स्मार्ट शहरांतील 2 हजार 432 शाळांचा आंतर्भाव योजनेत करण्यात आला असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. निवड झालेल्या प्रत्येक शाळांना 20 लाख रुपयांचे आर्थिक साह्य देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय संख्या
नगर - 4, अकोला - 1, अमरावती - 6, बीड - 1, बुलडाणा - 4, चंद्रपूर - 1, धुळे - 2, गडचिरोली - 2, गोंदिया - 7, हिंगोली - 1, जळगाव - 3, जालना - 1, लातूर - 4, मुंबई उपनगर - 4, नागपूर - 7, नांदेड - 1, नंदूरबार - 1, उस्मानाबाद - 2, रायगड - 2, रत्नागिरी - 2, सांगली - 2, सातारा - 8, सोलापूर - 2, ठाणे - 3, वर्धा - 2, वाशीम - 4 आणि यवतमाळ - 3.
|