मी महाराष्ट्रात येणार नाही - गडकरी

Nitin-Gadkari
Nitin-Gadkari

नागपूर - सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद सुटण्याचे चिन्ह दिसत नसले, तरी राज्यात लवकरच युतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, या प्रश्‍नावर त्यांनी मी दिल्लीतच खुश असल्याचे स्पष्ट केले. 

राज्यातील सत्तेचा पेच लवकरच सुटणार आहे. त्या संदर्भात शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकार बनेल. जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे, त्यामुळे सरकार युतीचेच बनेल, असेही गडकरी म्हणाले. आपल्या नावाची चर्चा काही माध्यमांतून सुरू आहे, या प्रश्‍नावर त्यांनी ती अफवा असल्याचे सांगितले.

आपण सध्या दिल्लीत आहोत. तेथे खुश असल्याने नागपुरात येण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचेही गडकरी यांनी सांगितले. भाजपकडे सर्वाधिक १०५ आमदार आहेत. भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील. जो काही वाद सध्या सुरू आहे, त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेतली. तुम्हालाही मध्यस्थी करण्याचा आग्रह केला जात आहे. यावर त्यांनी संघाचा आणि राजकारणाचा संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राजकीय घडामोडीत सहभागी होत नाहीत. त्यांचा आणि राजकारणाचा संबंध जोडणे योग्य नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com