तुमच्या नेत्यांनाच जाब विचारा; राज ठाकरेंचा 'डोस' 

तुमच्या नेत्यांनाच जाब विचारा; राज ठाकरेंचा 'डोस' 

चारकोप : बिहार- उत्तर प्रदेशातील नागरिकांना रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये जावे लागते आणि तेथे अपमानित व्हावे लागते. याबाबत तुमचा स्वाभिमान कोठे जातो? त्याबद्दल तुम्ही तेथील राज्यकर्त्यांनाच जाब विचारा, असा "डोस' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कांदिवली येथे उत्तर भारतीय संमेलनात दिला. 

मुंबईतील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांबाबत दिल्लीची माध्यमे चुकीचे चित्र रंगवतात. आसाम, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होतात, तेव्हा चर्चा का होत नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात हिंदीतूनच केला. देशाला सर्वांत जास्त पंतप्रधान उत्तर प्रदेशाने दिले आहेत, तरीही उत्तर प्रदेश व बिहारचे राज्यकर्ते तेथे उद्योगधंदे आणू शकले नाहीत, त्यामुळे तेथील नागरिकांना रोजगारासाठी अन्य प्रांतांमध्ये जावे लागते, असे ते म्हणाले. 

काही वर्षांपूर्वी आसाममध्ये बिहारींविरोधात हिंसक आंदोलने झाली होती. नुकतेच गुजरातमधूनही उत्तर भारतीयांना हाकलून देण्यात आले. बिहार- गोवा रेल्वेगाडी सुरू होत असताना, "आम्हाला भिकाऱ्यांची गाडी नको,' असे उद्‌गार गोव्याच्या एका मंत्र्याने काढले होते, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. 

महाराष्ट्रातील सुसंस्कृत नागरिकांनी उद्योगांना पोषक वातावरण निर्माण केले. उत्तरेतही सुसंस्कृत लोक भरपूर असल्याने त्यांनी तेथे उद्योगधंदे आणावेत. तुमचे राज्यकर्ते तेथे विकास करत नाहीत म्हणून तुम्हाला अन्य राज्यांमध्ये जाऊन अपमानित व्हावे लागते. तुम्ही असे अपमानित का होता? तुमचा स्वाभिमान जातो कोठे? राज्याचा विकास का करत नाही, याचा जाब तुम्ही तेथील राज्यकर्त्यांना विचारा, असा सल्ला त्यांनी दिला. 

संघर्ष का होणार नाही? 
माझे विचार पूर्वी आहेत तेच आहेत. यूपी- बिहार- झारखंडमधून रोज 48 रेल्वेगाड्या मुंबईत येतात. या शहराच्या क्षमतेहून अधिक लोक आल्यास जुन्या लोकांनी कोठे जायचे? तेथून फक्त गुन्हेगार आले, तर ते आम्हाला चालणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात पुष्कळ बेरोजगार असताना बाहेरून लोक येतात; मग संघर्ष का होणार नाही, असा सवाल त्यांनी केला. मुंबईत झोपडीवासीयांना मोफत घरे देण्याची योजना 1995 मध्ये मुंबईत आल्यामुळे लोंढे वाढले, असे सांगत ठाकरे यांनी ही योजना आणणाऱ्या शिवसेनेवरही टीका केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com