मुंबई - जातीवर आधारित आरक्षण हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला घटनात्मक अधिकार आहे. दलित, आदिवासींचा आरक्षणाचा घटनात्मक अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तसा प्रयत्न झाला, तर त्यास तीव्र विरोध करून तो हाणून पाडू, असा इशारा देऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांच्या आरक्षण बंद करण्याच्या भूमिकेचा आठवले यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले, ""आरक्षण बंद करण्याची वैद्य यांची मागणी पूर्ण चुकीची आहे. ती "आरएसएस'ची भूमिका असू शकते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आरक्षणाच्या अनुकूल राहिली आहे. सरकार सामाजिक आरक्षणाच्या बाजूचे आहे. देशात जोपर्यंत जातिव्यवस्था आहे, जातिभेद आहे, तोपर्यंत जाती आधारित आरक्षण राहील.''
आरक्षण बंद करण्याची भूमिका घेण्याआधी देशातील जातिव्यवस्था नष्ट करण्याची भूमिका "आरएसएस'ने घ्यावी, असे आवाहन आठवले यांनी केले. दलित आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर सर्व समाजघटकांना आर्थिक आरक्षण देण्याची आपण भूमिका घेतली आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून 75 टक्के करावी, तसेच उर्वरित 25 टक्के सर्वांसाठी खुले ठेवण्यात यावे. त्यामुळे सर्वांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल व त्यावरून होणारी भांडणे मिटतील, असेही यांनी स्पष्ट केले.
|